पोलिसांची तक्रार मा.अजितदादांना देऊ नये म्हणून जागृत नागरिकाला पोलिसांनी जनता दरबार रांगेतुन काढले बाहेर
बारामती: (महाराज्य टाईम्स) बारामती शहरातील खंडोबानगर येथिल गॅरेजमधून तिन वेळा चोरी झाली. गॅरेज मालकाने शेवटी स्वत:च चोराला दबा धरुन पकडले. ३ लाख रुपयांचा माल चोरीला जाऊनही बारामती शहर पोलिसांनी केवळ ३० हजार रुपयांच्या चोरीची फिर्याद दाखल करून घेतल्यामुळे याबाबत तक्रारदाराने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे जनता दरबारात धाव घेतली. पण पोलिसांविषयी तक्रार आहे कळाल्यावर जागृत नागरिकाला पोलिसांनी रांगेतुन बाहेर काढल्याचा प्रकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समोरच घडला.
बारामती शहरातील खंडोबानगर येथे सागर तानाजी देवकर यांच्या मालकीचे श्रेयश ऑटो हे चारचाकी दुरुस्तीचे गॅरेज आहे. ८ जानेवारी रोजी या गॅरेजमधून ३ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेण्यात आला. त्यावेळी सागर देवकर यांनी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या दरम्यान, पोलिसांनी गॅरेजवर जाऊन घटनेची माहिती घेत आम्ही लवकरच चोराला पकडू असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर पुन्हा दि. १४ जानेवारी रोजी चोरीचा प्रकार घडला. त्यावेळीही सागर देवकर यांनी तक्रार दिली. मात्र पोलिसांनी त्याची कसलीही दखल घेतली नाही. त्यानंतर दि. १९ जानेवारी रोजीही पुन्हा चोरीचा प्रकार घडला.
सतत चोरी होत असल्यामुळे सागर देवकर यांनी दररोज रात्रीच्या वेळी गॅरेजवर पहारा देण्यास सुरुवात केली. त्यांनी मोठ्या शिताफीने एकाला चोरी करताना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या चोरट्याने केलेल्या गुन्ह्याची कबुली देत चोरलेला माल कुणाला विकला याचीही माहिती दिली. मात्र पोलिसांनी सागर देवकर यांची फिर्याद घेताना ३ लाख २५ हजारांच्या मुद्देमालाची नोंद न करता केवळ ३० हजारांची चोरी दाखवली आहे.
दरोड्याचा गुन्हा दाखल होईल म्हणून पोलिसांनी कमी रकमेचा मुद्देमाल दाखवल्याची तक्रार सागर देवकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. श्री जाधव पोलिस कर्मचारी तर म्हणाले "आपण बाहेर भेटू चहापाणी करू व बोलू. काळजी करू नका मी चोराला पकडून आणतो." प्रकरण बाहेरच्या बाहेर मिटवण्याचा इरादा तक्रारदार यांना लक्षात आल्यामुळे त्यांनी अजितदादांना दिलेल्या अर्जात जाधव पोलिसाचा उल्लेख केला आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेत अजितदादांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
जनता दरबारात शेकडो लोकांसमोर अजितदादांनी जागृत नागरिकाचे कौतुक करत मोठ्या आवाजात अर्ज वाचून दाखवत पोलिसांची चांगलीच कानउघाडणी केली असल्याचे तक्रारदार यांनी महाराज्य टाईम्सशी बोलताना सांगितले.
"एकनाथ शिंदेना सांगा नाही तर अजित पवारांना सांगा चोराचा जबाब बदलू शकत नाही" तक्रारदारालाच अरेरावीची भाषा
सागर देवकर यांच्या गॅरेजमध्ये तीनवेळा चोरीचा प्रकार घडल्यानंतर स्वत:च चोर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. मात्र पोलिसांनी ३० हजारांच्या चोरीची फिर्याद दाखल केली. त्यामुळे सागर देवकर हे प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी सतत संबंधित तपासी अधिकाऱ्यांची भेट घेत होते. त्यावेळी त्यांना अक्षरश: अरेरावीची भाषा वापरत तुम्ही कुठेही जा, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना सांगा नाहीतर अजित पवारांना सांगा फिर्याद बदलणार नाही" असं सांगण्यात आल्याचे तक्रारदार देवकर यांनी महाराज टाईम्सशी बोलताना सांगितले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा