हुकुमशाही विरोधात लोकशाहीचा विजय !! न्यायालयाच्या आदेशाने उमेदवारी अर्ज दाखल! ! २ प्रभागांची निवडणूक पुढे ढकलली !
महाराज्य टाईम्स(बारामती) :
नगरपरिषदेच्या दोन प्रभागातील निवडणूक पुढे जाणार असल्याचे आज स्पष्ट झाले. प्रभाग 17 अ तसेच प्रभाग 13 ब मधील उमेदवारांचे अर्ज जिल्हा न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार स्विकारण्यात आले आहेत. या दोन जागांसाठी 26 नोव्हेंबर रोजी नामनिर्देशन पत्र स्विकारण्यात आले आहे. या दोन नामनिर्देशन पत्रांबाबत पुढील प्रक्रीयेविषयी (छाननी, उमेदवारी माघारी घेणे, इत्यादी) बाबत राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम प्राप्त झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिका-यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे. या दोन जागा वगळून नगराध्यक्ष व इतर सर्व जागांसाठीचा उर्वरित निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच पार पडणार आहे.
(भाजप नेते सतिश फाळके/अपक्ष- अँड.अविनाश गायकवाड)
निवडणूक प्रक्रियेदरम्यान भाजपचे नेते सतीश फाळके आणि अविनाश गायकवाड यांचे उमेदवारी अर्ज छाननीमध्ये नामंजूर करण्यात आले होते. या निर्णयाविरोधात त्यांनी बारामती सत्र न्यायालयात धाव घेतली होती. विशेष म्हणजे, त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयात अर्ज सादर करतानाचे सीसीटीव्ही फुटेज न्यायालयात पुरावा म्हणून सादर केले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आणि नैसर्गिक न्यायाचे तत्त्व लक्षात घेऊन न्यायालयाने प्रशासनाला हे अर्ज स्वीकारण्याचे आदेश दिले.
न्यायालयाच्या निकालाने भाजपला मोठा दिलासा मिळाला असून, बुधवारी (26 नोव्हेंबर) या दोन्ही उमेदवारांचे अर्ज नव्याने दाखल करून घेण्यात आले आहेत. या घडामोडींमुळे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संगीता राजापूरकर यांनी तातडीने एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार, प्रभाग 13 (ब) आणि 17 (अ) या दोन जागा वगळून उर्वरित निवडणूक प्रक्रिया 2 डिसेंबरला पार पडणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानुसार अर्ज स्वीकारले असले, तरी त्यांची छाननी आणि माघारीची प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित कार्यक्रम आणि आदेश मागवण्यात आले आहेत. आयोगाचे निर्देश आल्यानंतरच या दोन जागांसाठीचे वेळापत्रक जाहीर होईल. तोपर्यंत या प्रभागांमधील निवडणूक स्थगित राहील, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बारामतीसारख्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघात घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली असून, आता या दोन जागांच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
निवडणूक आयोग निश्चित करेल त्या दिवशी पुन्हा मतदारांना असे दुसर्यांदा मतदान करावे लागणार आहे.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा