श्रीरामदास नवमी सप्ताहात सौ.विनया कुलकर्णी–उत्पात यांचे प्रभावी निरूपण
भक्तीमार्गाचे मर्म उलगडणारी भावपूर्ण पुष्पगुंफण
श्रीरामदास नवमी सप्ताहात सौ. विनया कुलकर्णी–उत्पात यांचे प्रभावी निरूपण
मोहोळ [ प्रभाकर बावधनकर ] : देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, मोहोळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रीरामदास नवमी सप्ताह सोहळ्या अंतर्गत व्यंकटेश मंदिर, मोहोळ येथे सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या तिसऱ्या दिवशी सौ. विनया कुलकर्णी–उत्पात यांनी “भक्ती पंथेची जावे” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, भावस्पर्शी आणि अंतर्मुख करणारे निरूपण सादर केले.
भक्ती म्हणजे केवळ देवपूजा अथवा कर्मकांड नव्हे, तर ती संपूर्ण जीवन व्यापणारी एक मूल्यनिष्ठ जीवनशैली असल्याचे त्यांनी आपल्या ओघवत्या, सहज सुंदर शैलीत प्रभावीपणे विशद केले. संत परंपरेतील विचारांचे संदर्भ, नामस्मरणाचे अनन्य साधारण महत्त्व, अहंकाराचा त्याग आणि ईश्वर प्राप्तीचा साधा पण सखोल मार्ग त्यांनी विविध उदाहरणांच्या आधारे उलगडून दाखवला. त्यांच्या शब् दसाधनेतून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला.
या भावपूर्ण निरूपणामुळे संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. उपस्थित श्रोते आत्मचिंतनात गुंतले असून, त्यांच्या विचारांना नवी दिशा मिळाल्याचे वातावरणातून जाणवत होते.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रा. बाजीराव जोशी यांच्यासह प्रा. आराध्ये, दत्तात्रय कुलकर्णी, दिलीप देशपांडे, दीपक देशपांडे, अॅड. अमोल देशपांडे, उमेश पुराणिक, दत्तात्रय देशपांडे, म्हमाणे, कोळेकर, राजन घाडगे, हेमंत कुलकर्णी, भारती देशपांडे, जानकी कुलकर्णी, अलकनंदा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच महिला व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नम्रता कुलकर्णी यांनी अत्यंत नेटकेपणाने व प्रभावीपणे पार पडले. आभार अंजली देशपांडे यांनी केले. श्रीरामदास नवमी सप्ताह सोहळ्यातील चौथ्या दिवसाचा हा कार्यक्रम उपस्थितांच्या मनावर भक्तीचा गहिरा आणि चिरस्थायी ठसा उमटवून गेला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा