व्हीएसआर विमान कंपनीवर गुन्हा दाखल करण्यास पोलिसांचा नकार? आमदार रोहित पवार व युगेंद्र पवार आक्रमक
महाराज्य टाईम्स: (बारामती) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भीषण विमान अपघातात झालेल्या मृत्यूनंतर पवार कुटुंब आक्रमक झाले आहे. आमदार रोहित पवार यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, संबंधित कंपन्या आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी केली आहे. त्यांच्या भूमिकेला आता अजित पवार यांचे दुसरे पुतणे युगेंद्र पवार यांनीही जोरदार पाठिंबा दिला आहे. दोघेही मिळून व्हीएसआर कंपनीविरोधात थेट पोलिसांत तक्रार दाखल करण्याची मागणी करत आहेत. त्यासाठी दोघेही बारामती पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. मात्र, पोलिसांनी एफआयआर दाखल केलेला नाही. त्यानंतर रोहित पवार चांगलेच आक्रमक झाले. समर्थकांनीही जोरदार घोषणाबाजी केली.
त्यानंतर रोहित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी रोहित पवार यांनी देशातील कोणत्याही नागरिकाला एफआरआय दाखल करण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. एफआरआय दाखल करण्यास नकार देण्यात आल्याने रोहित पवार यांनी संबंधीत विमान कंपनीवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांवर कोणाचातरी दबाव आहे का?
रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी घातपाताची शक्यता व्यक्त करत तपास यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी DGCA, सीआयडी आणि केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयाच्या भूमिकेवर संशय व्यक्त करत VSR कंपनीला वाचवण्याचा व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. या पार्श्वभूमीवर रोहित पवार मरीन लाईन्स पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथेही गुन्हा दाखल करुन घेण्यास नकार दिल्याचे सांगितले. एफआयआर नोंदवण्याच्या मागणीवरून पोलिस अधिकारी आणि पवार यांच्यात वाद झाला. माध्यमांशी बोलताना पवार म्हणाले की, DGCAच्या परिपत्रकात VSR कंपनीच्या 25 पैकी 5 विमाने थांबवण्याचे आदेश दिल्याने संशय अधिक बळावला असून नव्या फौजदारी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवावा, अशी त्यांची मागणी आहे. मात्र, पोलिसांवर कोणाचातरी दबाव असल्याचे जाणवत आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
अपघाताच्या दिवशी घडलेला घटनाक्रम सांगताना युगेंद्र पवार यांनी भावनिक शब्दांत अनुभव मांडला. मीच सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचलो. बारामती विमानतळावर गेल्यावर सुरुवातीला काहीच दिसत नव्हते. त्यामुळे मी गाडी थेट रनवेवर नेली. 11 नंबर रनवेच्या टोकाला सुमारे 50 फूट खाली विमान कोसळलेले दिसले, असे त्यांनी सांगितले.
त्यांच्या मते, विमान पूर्णपणे जळून खाक झाले होते. संपूर्ण दृश्य धक्कादायक होते. दरम्यान, रोहित पवार यांनी याआधी मुंबईतील मरीन लाईन पोलिस ठाण्यात जाऊन एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तिथे तक्रार नोंदवली गेली नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे आता बारामतीत औपचारिक तक्रार देण्याचा निर्णय घेतला असून युगेंद्र पवारही त्यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. व्हीएसआर कंपनी आणि संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्याची त्यांची मागणी आहे.
सीआयडी तपास योग्य दिशेने, घातपाताची शक्यता तपासली जातेय - अपर पोलिस महासंचालक सुनील रामानंद
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताचा सीआयडी तपास योग्य दिशेने सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली आहे. या अपघातात घातपात, निष्काळजीपणा किंवा कोणते गुन्हेगारी कृत्य घडले आहे का, याचा सखोल तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
रामानंद यांनी स्पष्ट केले की, बारामती वैद्यकीय महाविद्यालय, फॉरेन्सिक लॅब आणि केंद्रातील अनेक तपास संस्था या तपासात मदत करत आहेत. एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन कमिटीचा (AAIG) तपासही सुरू असून, त्यांचे निष्कर्ष विचारात घेतले जात आहेत.
तपासात घातपात, निष्काळजीपणा किंवा गुन्हेगारी कृत्य निष्पन्न झाल्यास, सीआयडी योग्य कलमाखाली गुन्हा दाखल करून पुढील तपास करेल आणि न्यायालयात अभियोग चालवण्याची तयारी ठेवली आहे. हा तपास गुन्हेगारी घटनांच्या अनुषंगाने केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
या घटनेचा तपास योग्य प्रकारे सुरू असून, केंद्रीय तपास यंत्रणा आणि विविध यंत्रणांची मदत घेतली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे, कोणत्याही तपासाला ठराविक मर्यादा नसते. या तपासात अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी असल्या तरी, तो योग्य दिशेने सुरू आहे.
गेल्या २८ दिवसांत अनेक पुरावे समोर आले असून, मोठ्या प्रमाणात पुरावे वेगाने गोळा करण्यात आले आहेत. उर्वरित पुरावे देखील लवकरच जमा करण्यात येतील, असे रामानंद यांनी सांगितले. सीआयडी नेमका कोणता तपास करत आहे आणि तपासाची गती काय आहे, यावरही लक्ष केंद्रित केले जात आहे, असे ते म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा